नर्मदे हर!!


नर्मदे हर!
काही दिवसांपूर्वी एक "मिसळपावकर" आत्मशून्य नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने बाहेर पडला. पण काही कारणाने त्याची परिक्रमा पुरी नाही झाली. त्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशात रहाणार्‍या यशवंत कुलकर्णीने 'एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा' ही सुंदर लेखमालिका 'मिसळपाव' संस्थळावर लिहिली होती. ती वाचताना या नर्मदा परिक्रमेबद्दल कुतुहल जागं झालं. की हे काय प्रकरण आहे? अशी कोणती प्रेरणा आहे, की जिच्यामुळे लोक हजारों मैलांचं अंतर पायी चालून जायला तयार होतात? तसं खूप वर्षांपूर्वी गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं. पण मध्यंतरीच्या वर्षात ते कुठेतरी मागे राहून गेलं होतं. यशवंतच्या लेखावर प्रतिक्रिया लिहिणार्‍यांनी जगनाथ कुंटे यांच्या 'नर्मदे हर' पुस्तकाचा उल्लेख केला होता. आयुष्यात कधी नर्मदा परिक्रमेला जाऊ न जाऊ, निदान प्रत्यक्ष जाऊन आलेल्याचे अनुभव वाचावेत म्हणून पुस्तकाचा शोध सुरू झाला. रत्नागिरीला गेले होते तेव्हा एका दुकानात चौकशी करता पुस्तक सध्या नाही मागवून देऊ असं सांगितलं. आता पुस्तकांच्या दुकानात जाऊन रिकाम्या हाताने परत कसं येणार? बाकी पुस्तक चाळायला सुरुवात केली. सहजच एका पुस्तकाकडे लक्ष गेलं. "नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा" लेखक गो. नी. दांडेकर.
-नर्मदेच्या तटाकी-
या पुस्तकाबद्दल ना कधी काही ऐकलं होतं ना वाचलं होतं. पहिली आवृत्ती जुलै १९४९ मग जुलै १९८७ आणि आता तिसरी आवृत्ती जुलै २००९. मध्यंतरी सुमारे २० वर्षे हे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. या पुस्तकात गोनीदांनी सुरू केलेल्या आणि अपुर्‍या राहिलेल्या नर्मदा परिक्रमेबद्दल लिहिलं आहे सुरुवातीच्या उण्यापुर्‍या ६७ पानांत आणि पुढे दुसर्‍या भागात म्हणजे 'दक्षिणवारा' मधे त्यांनी १९८४ साली केलेल्या दक्षिण भारताच्या प्रवसाचं प्रवासवर्णन आहे. दक्षिणवारासुद्धा नेहमीच्या रसाळ आणि प्रसन्न गोनीदां शैलीत आहे. पण आता त्याबद्दल काही लिहीत नाही.'नर्मदातटाकी' मधे विद्यार्थी वृत्तीने श्रीधरशास्री पाठक यांच्या धुळे इथल्या आश्रमात गुरुगृही राहात असताना केलेल्या अधुर्‍या नर्मदा परिक्रमेचा वृत्तांत आहे.
गोनीदां हा माणूस जातिवंत भटक्या. आश्रमात राहिल्यापासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून या भटक्यासमोर कोणीतरी नर्मदा परिक्रमेविषयी रोज काहीतरी बोलावे. मग गुरुजींनी नर्मदा परिक्रमा कोण करील म्हणून विचारताच गोनीदांमधला हा भटक्या जागा झाला आणि गोपाल तसाच परिक्रमेला निघाला. बरोबर किती सामान ते! दोन लंगोट्या, एक धोतर, एक तांब्या, एक सतरंजी आणि गीताभाष्य! नर्मदेपर्यंत पोचायला रेल्वेच्या तिकिटाचे पैसे? नव्हतेच! मग गुरूजींनीच सोय केली धुळ्याहून हर्दा, तिथून बसने हांडिया गाठले, आणि गोपालाची परिक्रमा सुरू झाली. नर्मदेच्या पहिल्या दर्शनाने मनी उमटलेले भाव गोनीदांनी अतिशय सुंदर रीतीने वर्णन केले आहेत. ठिकठिकाणची नर्मदेची रूपं, ती पाहून गोनीदांच्या मनात आलेले विचारतरंग, आणि त्यांचं वर्णन करताना ठिकठिकाणी सहजच आलेल्या काव्यपंक्ती, अभंगांच्या ओळी, सूक्ते, श्लोक, अक्षरशः वाचकाला मेजवानी आहे.
पहिल्याच दिवशी पहाटे नर्मदामय्याच्या आरतीने जाग आली आणि मग "ते अद्भुत रूप माझ्या समोर एखादी पैठणीची घडी उपलपावी, तशागत दृश्य केले" अचानक आकाशातला आणि नर्मदामय्यातला चैतन्याचा खेळ पाहताना सगळे विश्व चैतन्यमय आहे असा स्पष्ट बोध एखादा साक्षात्कार व्हावा तसा झाला आणि "अतीव आनंदाने दोन्ही हात वर उभवून गोपाल ओरडू लागला, "हरिरेव जगत| जगदेव हरि:|" एवढ्यात एका पंडताने "कहां के हो महाराज?" म्हणत गोपालाला परत नेहमीच्या जगात आणून सोडले. गोनीदां मग नर्मदामय्याला विनवू लागले, "मय्या मला पुन्हा दे ना मघाचा आनंद!" पण नर्मदामय्याच्या लहरींनी जणू उत्तर दिले, "पोरा, अजून खूप पहायचे आहे तुला. खूप उशीर आहे तिथे पोचायला. तुझी खूपशी भावंडे आहेत. दु:खी, दीन, दुबळी. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मगच मगच तू तिथे पोहोचू शकशील!"
मय्याच्या तटाकी शेकडों हजारों वर्षांच्या परिक्रमींच्या वाटचालीने तयार झालेल्या पावटीवरून चालताना गोपालाचे मन भरून यावे. या वाटेवरून किती ऋषीमुनी चालून गेले असतील, कधीतरी माझी ज्ञानोबामाऊली नामदेवाबरोबर कदाचित या वाटेवर चालली असेल, अशा विचारानी अद्भुत आनंद मिळावा. आणि अशातच एक चटचटत्या दुपारी नर्मदेच्या वाळवंटात एक ७/८ वर्षाचे नागवे लेकरू मय्याचं पाणी आणायला मातीची फुटकी मडकी घेऊन निघालेलं गोपालाने पाहिलं. अशा पेटत्या दुपारी हे काय करते आहे पाहूया म्हणून गोपाल त्याच्या पाठीमागे त्याच्या मोडकळल्या झोपडीपर्यंत गेला, तर झोपडीत लाज राखण्यापुरते पटकूर नेसलेली त्या पोराची आई बसलेली. या दोघांच्या मधे एका खापरात अर्धी वाळकी भाकरी आणि त्या भाकरीच्या तुकड्यासाठी मग त्या मायलेकरात तुंबळ द्वंद्व सुरू झाले. त्या क्षणी गोपालाला साक्षात्कार झाला मोठे बंगले आणि ही मायलेकरे दोन्ही एका समाजपुरुषाची अंगे आहेत. जोपर्यंत तुझा समाजपुरुष आपल्या या जीर्णशीर्ण अंगाचे निरीक्षण करण्याएवढा सावध बनत नाही, तोपर्यंत तुला मोक्षाच्या मागे लागण्याचा अधिकार नाही!
एक विलक्षण अस्वस्थता आली आणि इथून पुढे परिक्रमेबरोबर गोपालाचा आंतरिक प्रवास सुरू झाला. या अस्वस्थतेचं उत्तरही मय्याच्या तटाकी मिळालं. एका ठिकाणी एक काळ्या दगडांचं सुरेख शिल्पांनी अलंकृत केलेलं भव्य मंदिर होतं. त्यावर ते बांधणार्‍या शिल्पकाराचं नाव नव्हतं काही नाही. बाजूला एक मोडकळीला आलेली धर्मशाळा होती आणि त्यावर पाटी, "कोण्या इनामदाराने ही धर्मशाळा बांधवून तिचा हक्क स्वतः आणि स्वतःच्या वंशजांसाठी राखून ठेवला आहे." आणि त्या क्षणी गोनीदांना अस्वस्थतेचं उत्तर सापडलं. ज्या क्षणी व्यक्ती ही केंद्रबिंदू झाली त्या क्षणी समाजपुरुषाची उपासना थांबली. आणि मोक्षासाठी देवाकडे वशिला लावायला सुरुवात झाली. सगळं मलाच, मला एकट्यालाच पाहिजे! पण हे आमचे तत्त्वज्ञान नव्हेच. आमचे तत्त्वज्ञान आहे त्या हजारों वर्षांच्या मंदिरासारखं. मंदिर उभं केलं आणि बांधणारा शिल्पकार समाजपुरुषात अनाम मिसळून गेला. समाजरूप होण्यातच संतोष आहे!
इथून गोनीदांची परिक्रमा शांत चित्ताने पुढे सुरू झाली. वाटेत महेश्वर पाहून अहल्याबाईंची आठवण जागी झाली. वाटेत नर्मदामय्याची असंख्य विलोभनीय रूपे पाहून गोनीदांना जे वाटलं त्याची वर्णनं मुळातूनच वाचण्यासारखी. नर्मदामय्याच्या कडेच्या पायवाटेवरून कोणकोण महानुभाव गेले असतील त्यांची गोनीदांनी कल्पना केली आहे आणि त्या अनुषंगाने आपले रसाळ अक्षरधन वाचकांवर उधळले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही परिक्रमा अर्धीच राहिली. पण शेवटी ते म्हणतात, ज्याला ज्याला शक्य आहे त्याने दर वर्षी काही काळ नर्मदामय्याच्या तटाकी घालवावा. ती आतुरतेने आपल्या लेकरांची वाट पहात आहे. ज्याला ऋजु अंतःकरण घेऊन तिजजवळ जाता येईल, अशा प्रत्येकाने तिच्या कुशीत काही काळ आसरा घ्यावा. आणि मग भारतीय संस्कृतीच्या पुनरुद्धाराचा मंत्र घेऊन समाजसन्मुख होऊन परत फिरावे. विचार करतेय, हे जमेल मला?
------------
नर्मदे हरः २
गोनीदांचं हे काहीसं अप्रसिद्ध पुस्तक वाचलं आणि तेवढ्यात आमच्या गावात मॅजेस्टिकचं पुस्तक प्रदर्शन आलं. तिथे जाऊन कुंटे यांचं पुस्तक शोधणं आलंच! एक पुस्तक दिसलं, नाव नर्मदे हर! उचललं तर लेखक श्री. रघुनाथ रामचंद्र गुण्ये. परत कुंटेंच्या पुस्तकाने हुलकावणी दिली. हातात आलेलं 'नर्मदे हर' थोडं चाळलं. विकत घ्यावं वाटलं आणि इतर पुस्तकांबरोबर तेही घरी आलं. घरी आल्याबरोबर गावाला गेलेल्या नवर्‍याला फोन केला, म्हटलं "गुण्ये नावाच्या माणसाचं पुस्तक विकत आणलंय." तो म्हणे, "त्या लेखकाचं पूर्ण नाव काय?" सांगितलं. अतर्क्य योगायोग असा, की नवरा म्हणाला, "अग ते आजच आपल्या घरी येऊन गेले." सासरे रहातात त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवधे गावाला लागूनच, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेरळ गाव आहे. तिथे हे लेखक श्री गुण्ये रहातात. आमच्या गावी आलेल्या एका मित्राला भेटायला ते त्या दिवशी आमच्या घरी येऊन गेले.
अत्यंत साधा निगर्वी मनुष्य. आयुष्यात सुरुवातीला काही वर्षे सिव्हिल इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरी केली. मग परमार्थात लक्ष गेलं. स्वामी स्वरूपानंदांचं शिष्यत्व लाभलं. प्रपंच केला नाही तरी रूढार्थाने संन्यासही घेतला नाही. त्यांनी अध्यात्मावर आणखीही पुस्तकं लिहिली आहेत. पण मी वाचलेलं हे एकच "नर्मदे हर". १९८२-८३ साली त्यांना नर्मदा परिक्रमेची ऊर्मी आली. त्यामागे कोणताही भाविक, धार्मिक उद्देश नव्हता. पण एक आंतरिक मस्ती होती, जी त्यांना नर्मदामय्याकडे ओढून घेऊन गेली. पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि कळलं की कुंटे यांना जे पुस्तक वाचून नर्मदा परिक्रमा करायची प्रेरणा मिळाली तेच हे पुस्तक!
आताच्यासारखे परिक्रमा सुरू करताना गुण्ये यांनी धार्मिक विधी वगैरे केले नाहीत, तर नेमावर इथून सरळ चालायला सुरुवात केली! फक्त स्वतःपुरते काही नियम त्यांनी बांधून घेतले, ते म्हणजे, अंगावरचे २/३ काय ते तेवढेच कपडे, एक पंचा, एक पातळशी शाल, एक तांब्या, एक वही (दैनंदिनी लिहिण्यासाठी), आणि बॉलपेन इतकंच काय ते सामान! स्वतः स्वयंपाक करायचा नाही. त्यामुळे कोणी शिधा दिला तरी उपयोग नाही. शिजवलेलं शुद्ध, कांदालसूण नसलेलं अन्न मिळेल ते खायचं, चहा कॉफी प्यायची नाही. भिक्षा मागायची नाही. नर्मदामय्याचं स्नान करून रोज रुद्राची एकादष्णी करायची. पिण्यासाठी नर्मदेचं पाणी वापरायचं. रोख पैसे जवळ ठेवायचे नाहीत! नेमावरला पोचताना गुण्येंजवळ ४० रुपये राहिले होते, ते त्यांनी ब्रह्मचारी विश्वनाथजींच्या आश्रमाला दान केले आणि गुण्ये परिक्रमेला तयार झाले!
रोज साधारण १८/२० किमी अंतर चालून गुण्ये यांनी १६० दिवसांत सुमारे ३२०० कि.मी. अंतराची परिक्रमा पूर्ण केली. ९ जानेवारी १९८३ ला सुरू झालेली परिक्रमा १० जून १९८३ ला पूर्ण झाली. वाटेत अनेक अडचणी आल्याच. शक्यतः आश्रमातून रहायचं पण जिथे अशी सोय होणार नाही तिथे कुणा गृहस्थाने बोलावलं तर त्याच्या घरी रात्र काढायची. एकट्याने चालायला सुरुवात केली होती पण वाटेत कोणी ना कोणी साथीदार थोड्या थोड्या अंतरात मिळत राहिले. आजारपणातून शुश्रुषा करणारे कोणी कोणी भेटत राहिले, जेवायला वाढणारे हात भेटत राहिले. ज्या प्रदेशात वस्ती नही पण शिधा उपलब्ध होता तिथे अन्न शिजवून वाढणारे परिक्रमीही भेटत राहिले. अगदी भिल्लांच्या प्रदेशातही जेवणाची व्यवस्था झाली. एकही दिवस आपल्यावर उपाशी झोपायची वेळ आली नाही आणि नर्मदामय्यानेच हे घडवलं अशी त्यांची श्रद्धा. एका खेडेगावात उपाशी झोपायची वेळ आली होती, पण जिथे स्त्रियांनी परपुरुषासमोर यायचं नाही अशी पद्धत त्या जागीही कोणा स्त्रीने रात्रीच्या अंधारात पुढ्यात येऊन प्रसादाचा लाडू खाऊ घातला. असेही अनुभव आले.
परिक्रमेत आलेल अनेक अनुभव गुण्यांनी अतिशय सजगपणे घेतले आणि मग वाचकांसमोर ठेवले. संन्याशानी स्वतः भरपेट जेवावे पण अतिथीला काही देऊ नये, तर कोणा हरिजनाने शक्य तेवढे करून गुण्यांना काहीतरी खाऊ घालावे असे अनुभव. अन्न कोणत्या जातीच्या माणसाने दिले आहे याचा गुण्ये यांनी विचार केला नाही. अतिशय थंडी असेल त्यावेळी कोण्या आश्रमात साधूने दिलेले ब्लँकेट घेण्याचा विवेकीपणा दाखवला आणि जेव्हा कुडकुडणारा दुसरा माणूस पाहिला तेव्हा ते ब्लँकेट त्या माणसाला द्यायला एका मिनिटाचाही विचार केला नाही. ही निर्मळता आपल्याला संपूर्ण पुस्तकात ठिकठिकाणी भेटते. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चेहर्‍यावर दिसणारी शांतता या त्यांच्या शिष्याच्या लिखाणात सगळीकडे दिसून येते.
शूलपाणीच्या जंगलात भिल्लांशी गाठ पडलीच. अगदी मातीचं मडकं आणि भोपळ्याचा तुंब्या काढून घेतलाच पण अंगावरची लंगोटीही काढून घ्यायचा प्रयत्न झाला. त्या भागात दारिद्र्य काय भयानक प्रमाणात असेल याची ही चुणूक. जंगलाच्या आधीच्या गावात डायरी ठेवल्यामुळे ती वाचली. आणि नंतर हे प्रवासवर्णन लिहायला ती उपयोगी पडली. पण आपलं सगळं सामान चोरीला गेलं म्हणून रडणारा "संन्याशी"ही त्यांना इथे भेटला! फक्त भगवे कपडे घालणार्‍या संन्याशांची गुण्यांनी माफक थट्टा केली आहे, त्याचवेळी मुलाला पाजणार्‍या एका भिल्ल स्त्रीला पाहून आपलं चित्त विचलित झालं होतं हा अनुभवही प्रांजळपणे सांगितला आहे.
परिक्रमा करणारे काय काय उद्देशाने परिक्रमा करतात याचं छान वर्णन या पुस्तकात आहे. तसंच वाटेत भेटणार्‍या अनेक साधू संन्याशांबरोबर झालेल्या चर्चा आपल्यापुढे ठेवल्या आहेत, पण हे कुठेही कंटाळवाणं होत नाही. तशीच अनेक व्यक्तींची लोभसवाणी चित्रं आपल्यापुढे उभी केली आहेत. गुण्ये यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन केले आहे, मोठ्या प्रमाणात पाठांतर केले आहे. या सगळ्याची उदाहरणे पुस्तकात ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. अनवाणी चालताना पायात घुसणारे काटे, आजारपण यांचं वर्णन करताना तीच निर्लेप वृत्ती जी त्यांना मोठेपणा देऊ पहाणार्‍या लोकांशी वागताना आहे. वाटेत लागलेल्या महेश्वर, मांडूगड यांचं सुरेख वर्णन आहे तसंच भकास आणि उपेक्षित अवस्थेत असलेल्या रावेरखेड इथल्या राऊंच्या समाधीचं वर्णन आहे. अमरकंटक, भेडाघाट यांचं वर्णन करताना गुण्ये यांची प्रासादिक शैली आणखीच सुंदर वाटू लागते.
"गृहस्वामिनी पंचविशीच्या आतली युवती. प्रसन्नवदना. परिक्रमावासी पाहून हरखलेली. चंद्रमौळी झोपडी. हातपाय पसरायला मिळेल एवढीच काय ती जागा.त्यात सगळा संसार." अशा प्रकारची छोटी छोटी चित्रदर्शी वाक्य सगळ्या पुस्तकभर विखुरलेली. वाटेत आलेल्या सगळ्या आश्रमांची आणि गावांची वर्णने या पुस्तकात आहेत. पुस्तक संपताना परिशिष्ट म्हणून या गावांची यादी आणि कोणत्या गावी किती चालून मुक्काम केला याचे तपशील आहेत. परिक्रमेच्या मार्गाचा उत्तम नकाशा आहे. परिक्रमेला जाऊ इच्छिणार्‍या लोकांना हे पुस्तक वाचून बरीच माहिती मिळेलच पण निव्वळ प्रवासवर्णन म्हणून वाचणार्‍यांची निराशा होणार नाही. मुळात व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे सरदार सरोवर प्रकल्पाकडे गुण्ये यांचं लक्ष गेलं नाही तर नवल! विस्थापितांच्या प्रश्नाबद्दल "एक मोठे शून्य नजरेसमोर उभे आहे." असं ते लिहितात. या योजनांचा लाभ काही लोकांना होईल पण जास्त लोकांना तोटाच आहे. लाभार्थींची काही जमीन विस्थापितांना द्यावी असा अभिनव उपाय ते सुचवतात, तेही इतक्या वर्षांपूर्वी! चालताना अनेक लोक धरणाची चौकशी करायचे आणि "नर्मदामैय्या प्रचंड पहाड फोडून येते, ती ही धरणे टिकू देणार नाही" असा विश्वास व्यक्त करायचे! ती सगळी मंडळी आज कुठे आहेत मय्याच जाणे!
या धरणांमुळे परिक्रमेचा मार्ग बदलला आहे, त्याचबरोबर या साध्यासुध्या लोकांच्या श्रद्धेलाही धक्का लागला असेलच. अनेक गावं, पेशवा सरकार राऊंची समाधी, जंगलं सारंकाही एक दिवस नर्मदार्पण होणार आहे, तेव्हा विस्थापितांबरोबरच त्या जंगलातले लहान ससे, भेकरं, या सार्‍यांचा आक्रोश कोणाच्या कानी पडणार आहे? तरीही नर्मदामैय्या वाहते आहे आणि आपल्या लेकरांना परिक्रमेला बोलावते आहे. या शेकडों हजारों वर्षांपूर्वीच्या रक्तातल्या हाकेला ओ देऊन कोणीतरी गुण्ये नाहीतर आत्मशून्य एक दिवस आपल्या अटींवर ती वाट चालू लागेल आणि परत आल्यावर आपले अनुभव आमच्याबरोबर वाटून घेईल. तोपर्यंत "नर्मदे हर!!"

टिप्पण्या

  1. namaskar jyotitai.
    lekh sundar aahe.hi pustake nashikla milatil ka? aamhi gelyavarshi parikrama keli.sadhya mi misalpav var lekh lihite aahe. vachave. yanda punha parikramela janar aahe.aapanas yayache aahe ka?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वंदना, धन्यवाद! तुमचे सर्व लेखही मी वाचते आहे. तुम्ही हल्ली बरेच दिवसात मात्र लिहिलं नाहीये ना!

      यापैकी र रा गुण्ये यांचँ पुस्तक नक्कीच नाशिकला मिळेल. गोनीदांचं मात्र मिळणं कठीण आहे. कारण खूप वर्षात त्याची नवी आवृत्ती आलेली नाही.

      परत परिक्रमेला जाताय हे वाचून खूप कौतुक वाटलं. कधीतरी परिक्रमा करायची खूप इच्छा आहे. पण या वर्षी मात्र नाही. कारण माझा मुलगा 12 वीत आहे. नंतर कधीतरी! तुमच्या बरोबर जायचा योग नशीबात आहे का पाहूया! तुम्हाला शुभेच्छा!

      हटवा
    2. नमस्कार ज्योतीताई,
      गो.नि.दांडेकरांचे नर्मदातटाकी आणि दक्षिणवारा पुस्तक बुकगंगा वरुन विकत घेतले फार छान आहे.मी नर्मदापरिक्रमा केल्या नर्मदामैय्या सुंदर आहेच,पण गो.नि.दां.च्या नजरेतुन ती आणखी सुंदर दिसली.यंदा पुन्हा परिक्रमेला मैय्या मला घेउन जाणार आहे तेव्हा नव्या दृष्टीने तिला डोळ्यात साठवता येईल.
      आपली,
      वंदना.

      हटवा
    3. नमस्कार ज्योतीताई,
      गो.नि.दांडेकरांचे नर्मदातटाकी आणि दक्षिणवारा पुस्तक बुकगंगा वरुन विकत घेतले फार छान आहे.मी नर्मदापरिक्रमा केल्या नर्मदामैय्या सुंदर आहेच,पण गो.नि.दां.च्या नजरेतुन ती आणखी सुंदर दिसली.यंदा पुन्हा परिक्रमेला मैय्या मला घेउन जाणार आहे तेव्हा नव्या दृष्टीने तिला डोळ्यात साठवता येईल.
      आपली,
      वंदना.

      हटवा
  2. Namaskar JyotiTai, I am looking for book नाव: नर्मदे हर! लेखक श्री. रघुनाथ रामचंद्र गुण्ये. Please let us know, where can I get it. Thank You

    उत्तर द्याहटवा
  3. नमस्कार! मी ही दोन्ही पुस्तके मॆजेस्टिकच्या पुस्तक प्रदर्शनातून घेतली होती. मॆजेस्टिककडे, किँवा साधना प्रकाशन किंवा कुठे ऑनलाईन मिळू शकेल.

    उत्तर द्याहटवा
  4. गुण्ये यांचे पुस्तक मला अप्पा बळवंत चौकात पर्वा मिळाले. अर्धे वाचले आणि त्यांच्या विषयि जाणून घेण्याची ईछआ झालाय आणि हा ब्लॉग सापडला. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर का ?

    उत्तर द्याहटवा
  5. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Earth’s Children

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर