आमचें गोंय- समारोप - आजचा गोवा


आजचा गोवा
६ डिसेंबर १९९२ ला आम्ही आमचं सामान घेऊन गोव्यात आलो. तो दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय, कारण त्याच दिवशी अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद विकोपाला जाऊन मोठाच गोंधळ झाला होता. वाटेत जागजागी पोलीस बंदोबस्त होताच. पण टीव्ही नसल्यामुळे नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. पण गोव्यात आल्यावर फार काही टेन्शन वगैरे जाणवलं नाही.
त्यापूर्वी आमची बदली होणार हे निश्चित झाल्यावर अधिकार्‍यांनी २ पर्याय दिले होते, एक तर मुंबई किंवा गोवा. मुंबईचं आयुष्य आणि गर्दी, लोकलचा प्रवास हे सगळं आपल्याला न झेपणारं, म्हणून आम्ही गोव्यात यायचा निर्णय घेतला, आणि आजपर्यंत कधीच त्याचा पश्चात्ताप झाला नाही. बदली झाल्यावर माझा नवरा आधी बॆंकेची शाखा नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी एकटाच पुढे आला होता. रत्नागिरी- पणजी बसने येताना वाटेत म्हापश्याला त्याने बॆंकेचा बोर्ड पाहिला. माझी म्हापश्याला बदली झाली होती , त्यामुळे तिथल्या लोकांनाही भेटून यावं म्हणून तो सहजच बॆंकेत शिरला.
ओळख झाल्यावर रहायची सोय काय म्हणून प्रश्न कोणीतरी विचारला. आता जागा शोधायची आहे म्हणताच एका स्टाफने लगेच म्हटलं. “अरे, परवा तो अमका अमका जागा भाड्याने द्यायची म्हणत होता!” लगेच माझ्या नवर्‍याला स्कूटरवर घेऊन तो जागा बघायला रवाना झाला आणि म्हापश्याला बसमधून उतरल्यापासून अर्ध्या तासाच्या आत घराची किल्ली त्याच्या हातात होती! तो खरंच बॆंकेचा स्टाफ आहे का, सांगतोय तोच आहे की दुसरा कोणी आहे, काही न विचारता मालकाने जागा भाड्याने दिली! गोंयकार कोणावरही पटकन विश्वास टाकतो. अगदी आपुलकीने बोलायला लागतो. पण याच सवयीने गोव्याचा हळूहळू घात झाला. अगदी काश्मिरी, नेपाळी गुन्हेगार, रशियन आणि इतर काही ड्रग्ज विकणारे आणि इतर परदेशी लोकही किनार्‍यांवर भाड्याने जागा घेऊन बस्तान बसवून राहिले. आता परदेशी नागरिक इथे राहून हॉटेल्स चालवायचे धंदे कसे करतात, हळूहळू जागा विकतही कशा घेतात, मला माहिती नाही पण हे सगळीकडे सर्रास ऐकू येतं. ड्रग्स विकणारे आणि रेल्वेतून आलेले गुन्हेगार यानी गोव्याला फास लावलाय.
शाळा कॉलेजांमधे ड्रग्स विकणारे आणि विकत घेणारे असतात हे मुलंही सांगतात. काही पर्यटकांचे संशयास्पद मृत्यू, वाढलेली गुन्हेगारी, पर्यटकांचे वाढते अपघात गोव्याच्या बाह्य जगात असलेल्या आकर्षक चित्राला कमीपणा आणतात हे नक्कीच! विशेषत: किनार्‍यांवर हे सगळं मोठ्या प्रमाणावर चालतं असं ऐकिवात आहे. वर वर शांत दिसणार्‍या, गोव्यात आतपर्यंत खूप खळबळ चालू आहे. मुंबईहून आलेल्या आमच्या काही कलिग्जना एका किनार्‍यावर काही हिंदी बोलणार्‍यांनी “इथे बसलात तर कापून काढू” अशी हिंदीतून धमकी दिलेली मला माहिती आहे. आज अशी परिस्थिती आहे, की आमच्यासारखे सामान्य घाबरट लोक फक्त पणजीच्या मिरामार किनार्‍यावर जातात आणि जास्त उशीर न करता परत येतात.
गोव्याला भेडसावणारा दुसरा मोठा प्रश्न म्हणजे खाणींचा. गोव्यात जंगल प्रदेशात लोह खनिजाचे मोठे साठे भूगर्भात आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी खाणमालक आणि राजकारणी यांनी अंदाधुंद खाणी सुरू केल्या आणि त्यामुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम घडून आले. काही ठिकाणी जलस्रोतांवर परिणाम झाले, तर बहुसंख्य भागात लोक खाणीतून काढलेल्या खनिजांच्या धुळीमुळे विविध आजारांनी ग्रस्त आहेत. रस्ते, घरे सगळ्यांवर धुळीचे थर, एवढंच काय जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी वस्त्यांमधे येताहेत आणि विनाकारण मरण पावताहेत. काही दिवसांपूर्वी वाळपईजवळ एका ढाण्या वाघाला मारल्याचे फोटो आले त्यानंतर गोव्यात पट्टेरी वाघ आहेत का यावर चर्चा सुरू झाल्या. जुने लोक सांगतात की गोव्याच्या कर्नाटक हद्दीवरील जंगलांत ढाण्या वाघाचं अस्तित्व आहे, पण जंगलं वाघांसाठी संरक्षित करावी लागतील या भीतीने काही लोक ते होऊ द्यायला तयार नाहीत.
गोव्यातली गाड्यांची वाढती संख्या, लहान आणि वळणावळणांचे रस्ते, यामुळे अपघातांचं प्रमाणही लक्षणीय आहे. पण देशात सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असल्याची ही गोव्याला चुकवावी लागणारी किंमत आहे. शेजारच्या महाराष्ट्र् आणि कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल स्वस्त आहे आणि गाड्याही स्वस्त आहेत. तशीच दारूही स्वस्त आहे, वाढत्या अपघातांना या सगळ्याच गोष्टी कारणीभूत ठरत आहेत.
गोव्यातल्या संधीसाधू राजकारणावर सगळेच ताशेरे ओढतात, पण त्याचे इतर काही दुष्परिणाम आहेत, त्यावर कोणीच कायमस्वरूपी इलाज शोधत नाही. कारण तशी इच्छाशक्ती कोणत्याच पक्षाकडे नाही. सत्ता चालवण्यासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंगमेकर आमदारांचा आधार घ्यावा लागतो, हे आमदार लहान मतदारसंघांमुळे सगळ्याच मतदारांच्या ओळखीचे असतात. मग कोणाचीही कसली मागणी पुरी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसतं. यात काही काही विचित्र निर्णय घेतले जातात, त्यात भलतेच कोणी भरडून निघतात.
२ वर्षांपूर्वीएक विचित्र कायदा करण्यात आला. जुन्या पुरातन वास्तू संवर्धनासाठी खाजगी व्यक्तींकडे हस्तांतरित करण्याचा. एवढंच नाही तर या खाजगी व्यक्तींना संवर्धनासाठी या पुरातन वास्तू पाडून परत बांधण्याचा परवानाही या कायद्यात आहे. शिवाय कोणीही या कायद्याला न्यायालयात आव्हान देऊ शकणार नाही अशीही तरतूद या कायद्यात आहे! या कायद्याचे परिणाम काय होऊ शकतात हे अगदी कोणाच्याही लक्षात सहज यैइल. उद्या कोणीतरी हॉटेलवाला एखादी पुरातन वास्तू ताब्यात घेऊन तिथे हॉटेल चालू करील आणि आपण त्या जागेचं संरक्षण करतोय असं सांगेल. किंवा मन मानेल तसं त्या वास्तूचं नूतनीकरण करील. खांडेपार इथल्या सप्तकोटेश्वर देवळाची अशीच पुनर्बांधणी करण्यात आली आणि ती मूळ देवळासारखी नाही हे फोटो पाहताच चटकन लक्षात येतं. पण या कायद्याला फारच थोडे लोक विरोध करतायत. पणजीच्या धेंपे कॉलेजातील इतिहासतज्ञ प्रा. प्रज्वल साखरदांडे हे हाताच्या बोटावर मोजता येतील अशा या लोकांपैकी एक.
गोव्यातले बरेच तरूण परदेशी स्थायिक होतात. तिथून आपल्या कुटुंबाला पैसे पाठवतात. शिवाय पूर्वीपासून गोव्यात बरेच लोक बर्‍यापैकी पैसे बाळगून आहेत. त्यामुळे कष्टाची कामे करायला मनुष्यबळ नाही. प्लंबर वगैरे कुशल कामगार बहुधा परदेशीच जातात. त्यामुळे इथे जी उणीव भासते ती पुरी करण्यासाठी शेजारच्या कर्नाटकातले, केरळातले आणि अर्थातच उत्तर भारतीय लोक गोव्यात स्थायिक होतात. आजघडीला फळं आणि भाजीपाल्याचा व्यापार बहुतांश हुबळीच्या मुस्लिम लोकांच्या हातात आहे तर मासे व्यापार भय्यांच्या हातात. आणि इतर पाव वगैरे बेकरी प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणात केरळी लोक तयार करून विकतात. एकुणात महाराष्ट्राचं जे दुखणं आहे, तेच गोव्याचंही आहे. पण गोंयकार जात्याच सोशीक आणि दुसर्‍याला आपलंसं करून घेणारा त्यामुळे त्याने बिनधास्त आपला व्यापार परप्रांतीयांच्या हातात जाऊ दिला. गोवा हे इतकं इटुकलं राज्य आहे की हे बाहेरून आलेले लोंढे लोकसंख्येच्या वाढीत मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे सगळ्याच सार्वजनिक सुविधांवर अतोनात ताण पडायला लागलाय.
गोंयकार २०२० सालापर्यंत गोव्यात अल्पसंख्य होतील अशी साधार भीती व्यक्त करण्यात येते, याला गोंयकारांकडे काही उपाय आहे का माहिती नाही. पण लवकर काही उपाय केले नाहीत तर इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती लवकरच नाहीशी होईल अणि एक बिनचेहर्‍याचं शहरीकरण झालेलं कलेवर इथं राहील याचं दु:ख आणि भय वाटतं.
आजपर्यंतच्या गोवेकरांच्या प्रेमाची, विश्वासाची परतफेड करता येणार नाही, पण इतकी वर्षं गोव्यात राहिल्यानंतर गोव्याबद्दल काही लिहायची संधी मिळालं हे मी माझं नशीब समजते, यातून गोव्याचं माझ्यावरचं ऋण थोडंतरी फेडलं असं मी म्हणू शकते. ही मालिका पुरी करण्यासाठी अनेक पूर्वसूरींना वाट पुसत आम्ही लिहिलं. त्यातील काही म्हणजे, बा.द. सातोसकर, यांचं 'गोवा - प्रकृती आणि संस्कृती'’, त्यांचेच गोमंतक ग्रंथाचे खंड, रियासतकार सरदेसाईंची रियासत, वामन राधाकृष्ण यांचं 'मुक्तीनंतरचा गोवा'’, बाळशास्त्री हरदास, मनोहरराय सरदेसाय, माधव गडकरी, अ.का.प्रियोळकर यांची पुस्तकं, उल्हास प्रभुदेसाई यांचं 'गंगावळ्ळी, नेत्रावळी, शंखावळ्ळी'’ आणि त्यांची इतर काही पुस्तकं, टिओटिनिओ डिसूझा यांची काही पुस्तकं, सरकारी गॆझेट्स आणखी इतरही खूप काही. सगळ्यांचाच उल्लेख करणं शक्य नाही पण या सार्‍यांचंच ऋण आमच्यावर आहे. तसेच या लेखमालिकेच्या निमित्ताने आम्हाला गोव्याचा इतिहास आणि समाजजीवनाचे ताणेबाणे यांचा अभ्यास करायला मिळाला याबद्दल ही मालिका लिहायची कल्पना करणार्‍या आणि आम्हाला लिहायला लावणार्‍या श्री. बिपिन कार्यकर्ते यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. ही मालिका मिसळपाव’ या संस्थळावर आणि त्यासोबत मायबोली’ आणि मीमराठी’ या संस्थळांवर एकाच वेळी प्रसिद्ध होत होती. त्यासाठी या सर्व संस्थळांचे चालक, व्यवस्थापक आणि वाचक यांच्या आम्ही अतिशय ऋणी आहोत.
काही वर्षांपूर्वी मी एक योगाचा कोर्स केला होता, तेव्हा एका कार्यक्रमासाठी आम्ही काही जण म्हापश्याहून पणजीला सकाळी ६.00 च्या दरम्यान पोचलो. तेव्हा आताच्यासारख्या गाड्या नव्हत्या. त्यामुळे ५/६ स्कूटर्स/मोटारसायकलींवर आम्ही १०/१२ जण गेलो होतो. पणजीत पोचलो आणि एकाच्या व्हेस्पाचा टायर पंक्चर झाला. स्कूटरचं किट नेमकं कुणाकडेच नव्हतं. आता मिरामारपर्यंत कसं पोचायचं याचा विचार सुरू होता, तेवढ्यात एकजण व्हेस्पावरून येताना मला दिसला. काही विचार न करता मी त्याला हात करून थांबवलं. किट आहे का विचारलं. नेमकं त्याच्याकडे होतं. तो म्हणाला, “तुम्ही पंक्चर काढा, मी तोपर्यंत दूध आणि पेपर घेऊन येतो.” बर्‍याच जणांची मदत असल्याने पटकन पंक्चर झालेला टायर बदलून झाला.
थोड्या वेळात तो परत आला. “देव बरें करूं” म्हणत त्याचं किट परत देऊन आम्ही निघालो. माझा सहप्रवासी मला विचारायला लागला, तो व्हेस्पावाला तुझ्या ओळखीचा आहे का? मला हसू आलं, कारण पणजीला यायची वेळ सुद्धा फार क्वचित यायची. मी म्हटलं, “थेट नाही, पण तशी एकुणातच मी गोंयकारांना ओळखते आणि त्यांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे.” हा विश्वास आजही कायम आहे. म्हणूनच गोव्याच्या पद्धतीने तुम्हालाही म्हणते, “देव बरें करूं!”
- ज्योति कामत
- इति लेखनसीमा -
*****
(सर्व भाग श्री.. बिपिन कार्यकर्ते, प्रीतमोहर यांच्या सोबत टीम गोवा तर्फे मायबोली, मिसळपाव आणि मीमराठी या संस्थळांवर प्रकाशित)

टिप्पण्या

  1. खूप मस्त लेखमाला.... सगळे लेख न चुकता वाचले आणी गोव्याबद्दल बरीच नवीन माहिती आणी इतिहास देखील समजला. पाहू गोवा प्रत्यक्ष कधी पहायला मिळतो ते.. तोपर्यंत 'सोबीत आमचें गोंय' ऐकतो, जेवढे समजेल तेवढे.
    मनापासून धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  2. अजूनपर्यंत गोव्याला जाण्याचा योग आला नाही. आता गोव्याविषयीचे कुतूहल वाढले आहे. चांगला लेख !

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद डॊ. सुनील अहिरराव्! उत्तर द्यायला जरा उशीर झालाय खरा. त्याबद्दल क्षमस्व!

      हटवा
  3. मस्त... गोव्याबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटते.. खास करून तिथला समुद्र. (मासे फार आवडत नाहीत तरीही). लेख छान आहेत. गोव्याला पुन्हा भेट द्यावी असं वाटतं..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

नर्मदे हर!!

रणबीर राज कपूर